वैकुंठ सरदेसाई
भारतीय प्राचीन ग्रंथातून दशावताराची जी कल्पना आहे, त्याला शास्त्रीय आधार शोधता येतो. पृथ्वीवरील प्राणीमात्रांची उत्क्रांती एकपेशीय प्राणीपासून होते. त्यांचे उत्क्रांत रूप अखेरीस माणसात झालेले दिसते. एकपेशीय प्राण्यांची सुरवात देखील पाण्यात होते व म्हणून आपल्या दशावतारातील मत्स्यावतार हा पहिला अवतार.
पृथ्वीवरील पाण्यातून जमिनीवर राहण्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्यावर कूर्मावतार (कासव) हा दुसरा अवतार मनाला जातो की, ज्यात पाण्यात व जमिनीवर राहणारे जीव जन्माला आले.
तिसरा अवतार वराहाच (चतुष्पाद प्राण्याचा) की जे केवळ जमिनीवरच आपली कालक्रमणा करू लागले. या तीन अवतारानंतर चौथा अवतार श्रीनृसिंहचा. नृसिंहअवतारात मानवाचे शरीर व सिंहाचे मस्तक म्हणजेच मानव संपूर्ण उत्क्रांत अवस्थेत यावयाच्या सीमारेषेवरील प्राणी, 'कडकडला स्तंभ गडगडले गगन' हा श्रीनृसिंहच्या आरतीतील उल्लेख कदाचित त्या काळात झालेल्या प्रचंड उल्कापाताचा असावा. (त्यामुळे पृथ्वीवरील महाकाय डायनोसारसारखे प्राणी नामशेष झाले.) या अवतारानंतर मानवाच्या पूर्णार्थाने विकसीत झालेल्या अवस्थेतील वामन, परशुराम, राम, कृष्ण आणि बुध या अवतारांमध्ये संपूर्ण विकसित मानवाने अन्यायाशी झगडा देऊन मानवजातीला वेळोवेळी आदर्श घालून दिले आहेत.
श्रीनृसिंह अवतारात हिरण्यकश्यपु या असुराने (वाईट मनोवृत्तीच्या मानवाने) दीर्घ तपश्चर्या करून ब्रम्हदेवांना प्रसन्न केले व ब्रम्हदेवांनी वर मागायला सांगितल्यावर अमरत्वाची मागणी केली. त्यावर ब्रम्हदेवांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न करताना सांगितले की, पृथ्वीवरील सर्व सजीवसृष्टीला उत्पत्ती, वृद्धी व शय (मरण) या स्थिती टाळता येत नाहीत, तेव्हा अमरत्व कुणालाही धारण करणे शक्य नाही. मग हिरण्यकश्यपुने मोठ्या चतुराईने जो वर मागितला त्यात त्याची तीच मागणी वेगळ्या शब्दांत आलेली दिसते. तो म्हणतो, "मला ब्रम्हदेवनिर्मित मनुष्य, प्राणी, देवता, दॆत्य यांच्याकडून मृत्यू येऊ नये. शस्त्राने, अस्त्राने, घरात, घराबाहेर, दिवस-रात्री, पृथ्वीवर किंवा आकाशात माझा वध होऊ नये". इतका चतुर युक्तिवाद करून हिरण्यकश्यपुने वर मिळवला, पण तितक्याच चतुराईने धड ना मानव, धड ना प्राणी घराच्या उंबऱ्यावर, तिन्हीसांजेच्या वेळी तीक्ष्ण नखांच्या सह्हायाने श्रीनृसिंहाने त्याला नष्ट केलेले आहे.
पुराणातील ही कथा काही जणांना अविश्वनीय वाटते. पण आज आपल्या सभोवताली पाहता काय दिसते? हिरण्यकश्यपुला मिळालेला वर मिळाल्यासारखे अनेक मदोन्मत, पिसाट, सत्तापिपासू आपल्या सभोवती वावरताना दिसतात. पार राजकारणापासून शैक्षणिक संस्थाच्या व्यवस्थापनापर्यंत आपल्येच वर्चस्व अभाधित राहावे म्हणून हे आधुनिक हिरण्यकश्यपु जातीयता, धर्मांधता, घराणेशाही अशा अनेक कुंपणामध्ये आपले अस्तित्व टिकवून आहेत. त्यांच्यापुढे समाज हतबल होतो, भयग्रस्त होतो, निष्क्रिय होतो आणी मग नृसिंह यांचेसारखे कुणाला तरी या वाईट प्रवृतींचा नाश करण्यासाठी सरसरून पुढे यावे लागते.
सार्वजनिक जीवनातील सौंदर्य, शिस्त, संयम, नैतिक संकेत हे गुण समाज एकसंघ राहण्यासाठी फार गरजेचे आहेत आणि कुणाचाही धाक नसल्याने आपल्या समाजाने नेमके हेच गुण निर्लज्जपणे सोडून दिले आहेत. अशा वेळी नृसिंह अवतारचे सद्य:स्थितीतील औचित्य जाणवते. आजही शास्ते, संस्थाचे पदाधिकारी, निर्णय घेण्याच्या स्तरातील अधिकार भोक्ते यांनी त्यांच्या प्रशासनात अन्यान होणार नाही, अशी वृत्ती बाळगली पाहिजे व त्यासाठी आपल्या श्रीनृसिंह अवताराच्या कथेतून योग्य बोध घेतला पाहिजे आणि आपण सर्व तर त्याचे उपासक, आपणसुद्धा या कथेचा बोध घेऊन आपल्या आचरणात योग्य ती जाणीव बाणवावी.
|