श्री नृसिंह जयंतीचा वार्षिक उत्सव साजरा करण्याची जी पूर्वापार पद्धत आहे ती अशी :
दिवस पहिला वैशाख शु. १०
१) सकाळी सुर्योदयाबरोबर कुलोपाध्याय यांज करवी देवाशेजारी समंत्रक नंदादीप स्थापना, नंदादीपाचे यथाविधी उध्वच्रण उत्सव समाप्तीनंतर पौर्णिमेच्या शेवटी व्हायचे.
२) उपाध्यायाकरवी रुद्राभिषेक युक्त श्रींची पूजा, आरती, पंचामृत, नैवेद्य व मंत्र पुष्प.
३) यजमानांच्या हस्ते षोडशोपचार मध्यान्ह पूजा अष्टोत्तरात नामावलीने देवावर तुलसीपत्र वाहणे. आरती पुरण-पोळीचा नैवेद्य व मंत्र पुष्प व ब्राम्हण भोजन.
४) सायंकाळी पुराण श्रवण.
५) देवापुढे हरिदासाचे कीर्तन, कीर्तन पूर्णे होते वेळी आरतीचे एक ताट करून ठेवावे लागते. आरतीचे ताटे पहिल्या दिवशी एक, दुसऱ्या दिवशी दोन याप्रमाणे वाढवत जायची असतात.
दिवस दिवस दुसरा, तिसरा आणि चौथा (वैशाख शु. ११,१२,१३)
वरील प्रमाणेच विधी करणे फक्त एकादशी दिवशी नैवेद्य फलहाराचा, व्दादशी व त्रयोदशीस नैवेद्य पुरण-पोळीचा न करता वडे, घारगे यांचा केला जातो. भोजनातही तेच पक्वान्न असा कुलाचार आहे .
दिवस पाचवा (वैशाख शु.१४ )
जयंतीचा दिवस :-
सकाळी- पहिल्या दिवशीच्या २ व ३ कलम प्रमाणे
दुपारी- यजमान नित्यप्रमाणे पूजा केल्यानंतर देवावर पवमान मंत्राने चार ब्राह्मणाकडून एकादशनी अभिषेक आरती मंत्रपुष्प नित्याप्रमाणे
संध्याकाळ- ४:०० वाजता (पुराण न करता) जन्मोत्सवाची पूजा यजमानाने स्व:ता बसून करायची, दीर्घ न्यास, लघुरुद्र, विष्णू सहस्त्र नामाने तुळशीपत्र वाहणे, आरत्या महानैवेद्य, मंत्रपुष्प हरिदास मिळाल्यास सूर्यास्तापूर्वी जन्मोत्सवाचे कीर्तन.
नंतर वसंत पूजा सर्वांस डाळ व आंब्याचे पन्हे देणे, सुवासिक फुलांचे गुच्छ वाटणे, ज्यांचा उपवास असेल त्यांना फलाहार देणे.
रात्री- गायन वादन, भजन, नाट्य, लळीत पहाटे पर्यंत चालू ठेऊन नंतर लळीत च्या पदांत हरिदासाचे कीर्तन सूर्योदयापर्यंत, हरिदासाची पाद्य पूजा व ओवाळणी. ओवाळणीच्या वेळेस देवापुढील
पाच आरत्या हरिदासाजवळ आणाव्या. त्यात प्रत्येकाने शक्य तेवढे रौप्य नाणे टाकावयाचे. पण जन्म कालच्या वेळेस पंचामृत युक्त तीर्थ सर्वांस घालावे. नंतर यजमान बुवास भेटणे व जमलेल्या मंडळींस नारळ, साखर वाटणे, ओवाळणी वेळेस सर्वांनी उभे राहणे. शेवटी हरिदास व कुलोपाध्याय यांनी यजमानाच्या कल्याणार्थ श्रींच्या जयघोषात उत्सव समाप्त करणे.
पौर्णिमेस जमलेल्या सर्व मंडळीस पक्वान्न भोजन देऊन पारणे करायचे. भोजन दक्षिणा रोज देणे. भोजोनोत्तर पानसुपारी, अत्तर गुलाल, हारतुरे व नारळ यथाशक्ती देऊन निरोप देणे व भिक्षुक, ब्राह्मण, हरिदास, गवई, वाजंत्री यांस यथायोग्य बिदागी देऊन व कुलोपाद्याय दक्षिणा देऊन यथोचित सत्कार करायचा, म्हणजे उत्सव यथासांग संपन्न झाला.
अलीकडे मात्र सर्वांच्या व्यस्तकार्यामुळे असेल पण उत्सव फक्त वैशाख शुद्ध चतुर्दशी याच दिवशी होतो.
सकाळी कुलोपाध्यांच्या मार्गदर्शनाखाली यजमानांच्याहस्ते श्रींची पूजा, पवमान मंत्राने अभिषेक, सकाळी सर्वांचाच उपवास असून संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी जन्मोत्सवाचे कीर्तन, नंतर जेवण आंब्याचे पन्हे, वाटली डाळ, वडे व लाडू, शिरा असे पदार्थ अवश्य असतात. नैवैद्याची दोन ताटे तयार केली जातात. एक नृसिंह व दुसरे गावदेवीला दिले जाते. रात्री उपवास सोडून सर्वजण आपापल्या घरी जातात.
|